Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना विशेष: वाढत्या कोरोना रुग्णांमुळे जनतेत चिंतेचे वातावरण

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे जनतेत चिंतेचे वातावरण... 


अनलॉकनंतर लातूरचे पुन्हा लॉकडाऊन कडे मार्गक्रमण जिल्ह्यात १५ ते ३० जुलै संचारबंदी घोषित!


देशासह राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची होत चाललेली विक्रमी वाढ यामुळे सर्वसामान्य जनतेसह, केंद्रशासन, राज्य यासोबतच स्थानिक प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली असून राज्यातील अनेक शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लातूर शहर आणि जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी १५ जुलै ते ३० जुलै पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी घोषित केली आहे. 


लॉकडाऊन हा कायमस्वरूपी पर्याय असू शकत नाही हे सत्य असले तरी सर्वसामान्य जनतेच्या जीविताची त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे शासनाचे मूलभूत कर्तव्य आहे हे ही तितकेच खरे. लॉकडाऊन काळात कोरोना संसर्गापासून जनतेला वाचविण्यासाठी, सुविधा पुरविण्यासाठी सरकारी यंत्रणा, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, स्थानिक संस्था, सामाजिक संघटना यांनी केलेले प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय, उल्लेखनीय आहेत. मात्र मिशन बिगीन अगेन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांची होत असलेली विक्रमी वाढ यामुळे सर्वसामान्य जनतेसह प्रशासनही चिंतातुर झाले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत असून अपुरी संसाधने, मनुष्यबळाचा अभाव यामुळे कोरोनाचा मुकाबला करताना प्रशासनास अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. किंबहुना प्रशासनाची हतबलता प्रकर्षाने जाणवत आहे.


प्रशासनासोबतच आता तुम्हा आम्हालाही या लढ्यात सक्रिय होणे गरजेचे बनले आहे. या विषाणूला फक्त तुम्ही म्हणजे तुम्हीच हरवू शकता ही खूणगाठ बांधली पाहिजे. सामाजिक जबाबदारी म्हणून स्वतःच शिस्त लावून घ्यावी लागेल. शरीराने दूर राहूनच एका सामाजिक विचाराने एकत्र होऊन कोरोनाशी लढू या. सामाजिक अंतर, मास्क, स्वच्छता या अत्यावश्यक आयुधांची सवय लावून घेतली पाहिजे.


रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर आपणास सुविधा आणि उपचार पुरविण्यासाठी प्रशासनास मोठी कसरत करावी लागेल. लॉकडाउन पर्याय नसला तरी वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात कडक आणि प्रभावी लॉकडाउनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून आता सर्वांनी सावधगिरी बाळगत स्वतः या कोरोना लढ्यात उतरून प्रशासनास सहकार्य करावे एवढीच अपेक्षा. यापुढील आपल्या स्वतःच्या आचारणावरच या लॉकडाऊनचे यश अपयश अवलंबून आहे हेच सत्य.


 


सतीश तांदळे


पत्रकार


लातूर


Post a Comment

0 Comments